Wednesday, September 30, 2015

माझा म्हातारा



आयुष्याच्या सुरुवातीपासून मला लाभलेला विद्येचा वटवृक्ष, माझे आजोबा.
२८-२९ वर्ष मला लाभलेलं संपन्न आजोळ. संस्कार आणि वात्सल्यानं ओतप्रोत भरलेलं. असंख्य अविस्मरणीय आठवणींचे हे वैभव मागे ठेवून माझा म्हातारा आता परलोकी मार्गस्थ झालाय.
काय काय मागे ठेवून गेला...
अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास मागे ठेऊन गेला.
अखंड ज्ञानसाधनेची अभ्यासू वृत्ती ठेऊन गेला.
यशापयशाची तमा न बाळगता एखाद्या ध्येयामागे सर्वस्व झोकून द्यायला लावणारी दुर्दम्य इच्छाशक्ती देऊन गेला.
स्थल-कालानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सवय लावून गेला.
भंकस अंधश्रद्धा अन् भाकड रूढींना छेद देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन गेला.
अक्षरओळखीपासून सुरुवात करून वाङ्गमयाचा व्यासंग देऊन साहित्याचे भांडार ठेऊन गेला.
शिक्षणाचे महत्व अन शिक्षकांप्रती कृतज्ञता शिकवून गेला.
माणसं निघून जातात आठवणी ठेऊन, असं आपण म्हणतो, पण मुळात आठवणी निर्माण करणारा सहवास आपण त्यांना द्यायला हवा.
माझ्या आईचा हा द्रष्टेपणा की माझ्या आजोबांचा सहवास तिने मला दिला. कारण सहवासातूनच संस्कार होत असतात. 

No comments:

Post a Comment